देशातील १३० शेतकरी संघटना सहभागी होणार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी किसान जागृती यात्रा संपूर्ण देशभर काढणार असून, यामध्ये सुमारे १३० शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. प्रथमच संपूर्ण देशातील शेतकरी एकत्र येत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वामिनाथन आयोगातील शिफारस म्हणजेच शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या दीडपट हमीभाव त्याला मिळाला पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सध्या शासन जी कर्जमाफी करण्याचा दावा करत आहे. पण ती निव्वळ फसवाफसवी असून, शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असा आरोप करून शेट्टी म्हणाले, जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करत आहे, त्यांनी उर्वरित कर्ज ३० जून अखेर भरल्यानंतरच त्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. असा अध्यादेश जारी करताना त्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत कर्जफेडीसाठी आहे. अशावेळी वेळेवर कर्ज भरणारा शेतकरीसुद्धा अचानक उर्वरित कर्जाची थकबाकी भरू शकणार नाही. याचाच अर्थ शासनाला अनुदान द्यायचेच नाही, असा होतो. म्हणूनच शासन केवळ शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत धूळफेक करीत आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकत्रे असून शेतकऱ्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाविषयी पत्रकारांनी विचारले असता, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत राहणार आहे. माझ्यासाठी शेतकरी महत्त्वाचे आहेत. यासाठी कुणाशीही दोन हात करण्याची माझी तयारी आहे. असा टोला त्यांनी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता लगावला. बांबवडे शहीद जवान श्रावण माने यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी सांकृतिक हॉल मंजूर करण्यात येणार असून सुमारे साडेसात कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती शेट्टी यांनी दिली. शाहूवाडी तालुक्यातील विकासकामाबाबत शेट्टी म्हणाले, की ग्रामसडक योजनेंतर्गत संशोधन आणि विकास या अंतर्गत अतिवृष्टी निधीतून सुमारे चार कोटींची रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत.