सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना इशारा

समाजमाध्यमाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांना लक्ष्य करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील म्होरक्यांना शनिवारी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी चांगलेच फैलावर घेतले. खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या बगलबच्चांवर लगाम घालावा अन्यथा त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा खरमरीत इशारा त्यांनी दिला. त्यांनी थेट शेट्टींवरही निशाणा साधला. यामुळे आधीच ताणलेले शेट्टी व खोत यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

गेल्या कित्येक दिवसांची मनामध्ये असलेली खदखद आज सदाभाऊ यांनी बोलून दाखवली. कोल्हापुरातील एका उद्घाटनप्रसंगी सदाभाऊ म्हणाले, येत्या २२ तारखेपासून राजू शेट्टी पुणे ते मुंबई अशी आत्मक्लेश यात्रा काढणार आहेत. शेट्टी यांना जर मी आत्मक्लेश यात्रेपासून लांब राहावे असे वाटत असेल तर त्याला माझी काही हरकत नाही. मी मळलेल्या वाटेवरून चालणारा नेता नाही. स्वत:ची वाट मी स्वत: तयार करू शकतो, या शब्दांत खोत यांनी खासदार शेट्टी यांना टोकदार प्रत्युत्तर दिले.

शेतकऱ्यांच्या संपाविषयी खोत म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे आहे. सरकारच्या तिजोरीतला पसा शेतकऱ्यांसाठीच खर्च झाला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही.