कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाल्याने कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी चौकामध्ये मध्यरात्री जल्लोष करण्यात आला.

आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. महाडिक म्हणाले,की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधानेच पडले. भाजप सरकार आता पुन्हा एकदा राज्यात जनतेची सेवा करण्यासाठी येत आहे, याचाच आनंदोत्सव साजरा करत आहोत. तर निवृत्ती चौक येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी आणि भाजपचा जयघोष करीत आनंद साजरा केला.

नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिकांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.