भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले. पण अशा प्रकारे मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही, अशी जहरी टीका राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयाला खाटा, व्हेंटिलेटरसह इतर सुमारे एक कोटी रुपयांच्या साहित्याची मदत देण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना ऐवजी अन्य माध्यमांना मुलाखत द्यावी, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यांच्या या विधानावर भाष्य करताना क्षीरसागर म्हणाले, “पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजपा–शिवसेना युती होती. या कालावधीत मातोश्रीवरील नेत्यांनी कधीही माध्यमांना मुलाखत दिली नाही. ते फक्त ‘सामना’मधूनच व्यक्त होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी गेल्या सहा वर्षांत माध्यमांना कधी मुलाखत दिली आहे का? असा सवालही यावेळी क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

गेल्या पाच वर्षांत दवंडी पिटवत काम केले. ती पद्धत म्हणजे योग्य कारभार करणे नव्हे. ठाकरे यांचे काम राज्यातील जनतेला माहिती आहे. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो हे नारायण राणेंनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी यावेळी पाटील यांना दिला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil suddenly grew like a mango fall says rajesh kshirsagar aau
First published on: 27-07-2020 at 17:42 IST