कोल्हापूर : नवभारताच्या उभारणीसाठी देशाकडे सुसंस्कृत, समृद्ध, स्वानंदी, सुरक्षित हे गुण असले पाहिजेत. प्रत्येक भारतीयांनी हनुमान उडी घेण्याचा विचार मनी बाळगला पाहिजे. भारताने विश्वगुरू होण्याच्या बरोबरीने विश्वबंधु होण्याची भूमिका निभावली पाहिजे.नुसते श्रीमंत होऊन चालणार नाही तर संतुलित विकास होणे गरजेचे आहे, असे मत विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा (कै.) सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ते‘नवभारताच्या उभारणीसाठी' या विषयावर बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार, दुर्गप्रेमी शिक्षक सु. रा. देशपांडे फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. माशेलकर यांनी बासमती, हळदीसारख्या पेटंट साठी दिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर लढ्याचा उल्लेख करून या प्रयत्नाचे फलित म्हणून यापुढे अशा प्रकारच्या चुकीच्या नोंदी पेटंट साठी होणार नाहीत असे नमूद केले. हेही वाचा >>>कोल्हापूरातील प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी इस्त्रोला रवाना भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करून ते म्हणाले, हरित ऊर्जा, स्त्री पुरुष संधीतील समानता, जात पात विरहित समाज निर्मिती, इतर धर्मियांचा आदर या गुणांची जोपासना केला पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था भक्कम होत आहे. ती तीन डॉलर ट्रिलियन इतकी होत आहे. 2047 साली ती 50 ट्रिलियन डॉलर होण्याचा ध्यास आहे. पण केवळ नुसते श्रीमंत होऊन चालणार नाही तर संतुलित विकास होणे गरजेचे आहे. याबाबत स्वामीनाथन, रघुराम राजन यांनी मांडलेले वास्तविक विचार लक्षात घेण्याची गरज माशेलकर यांनी व्यक्त केली. डॉ. सागर देशपांडे यांनी प्रास्तविक केले. समीर देशपांडे यांनी स्वागत केले.राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आमदार जयश्री जाधव, श्रीमती स्नेहलता सुधाकर देशपांडे, विनोदकुमार लोहिया उपस्थित होते.