कोल्हापूर : एकीकडे पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम शेतीसाठी पाणी उपसाबंदीचे आदेश जारी केले असताना दुसरीकडे शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदी कोरडी पडल्याने पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ बंधाऱ्याच्या खालील बाजूस कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमापर्यंत उपसाबंदी करण्यात आली आहे.

पंचगंगा नदीवरील ‍शिंगणापूर बंधाऱ्याखाली ते शिरोळ बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावर उपसाबंदी करण्यात आली आहे. अनधिकृत उपसा आढळून आल्यास उपसायंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल असे कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितले.

हेही वाचा : कोल्हापुरात नृत्यनाट्य मधून शिवरायांचे प्रसंग साकारले; एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याचा प्रश्न गंभीर

शिरोळ तालुक्याची वरदायिनी असणारी पंचगंगा नदी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरडी पडली आहे. काही ठिकाणच्या पाण्याचे साठे वगळता तेरवाड बंधारा आणि नांदणी पुलापर्यंत नदीपात्र आटले आहे. या परिसरातील आडसाली लावणीचा ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तर काही गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राधानगरी धरणातून पंचगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत असताना आता पाणी उपसा केल्याने अडचणीत भर पडली आहे. ऑक्टोबर महिन्यात तेरवाड बंधारा शिरढोण पूल आणि नांदणी पुलाजवळ पूर्ण नदी कोरडी पडल्याने तळाचा खडक दिसू लागला होता. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.