नदीवरील पाण्यावर अवलंबून असलेली पिके धोक्यात आली आहेत. ऊस आणि भाजीपाल्यांची पिके वाळत चालली असल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने उद्योगाला दिले जाणारे पाण्यामध्ये कपात करून ते शेतीला देता येते का यासंबंधी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बठक घेऊन निर्णय घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी याबाबत कधी निर्णय घेतात याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. हा निर्णय पिके वाळून जाण्यापूर्वी घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपसाबंदी लागू असल्याने पिके वाळत आहेत. ही उपसाबंदी उठवा, अन्यथा विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस यांच्या वतीने स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्याकडे करण्यात आली. उपसाबंदी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांपासून राधानगरी ते शिरोळपर्यंत नदीवरील उपसाबंदी केली आहे. त्यामुळे नदीवरील पाण्यावर अवलंबून असलेली पिके धोक्यात आली आहेत. ऊस आणि भाजीपाल्यांची पिके वाळत आहेत. त्यामुळे पाण्याची एक पाळी देण्यासाठी उपसाबंदी शिथील करावी. अन्यथा शेतकऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण होईल. उपसाबंदी केल्याने वाळलेल्या पिकांचे पंचनामे करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांना पाणी न देण्याची भूमिका नाही. आणखी एक पाण्याची पाळी देण्यासाठी प्रशासन विचार करेल. पंचगंगेत मिसळणारे सांडपाणी उपसण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी ‘पाटबंधारे’चा सल्ला घेतला जाईल. धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सनी यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. डॉ. जािलदर पाटील, बंडू पाटील, शिवाजी माने, जनार्दन पाटील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry water reduction for agriculture
First published on: 27-05-2016 at 02:47 IST