कोल्हापूर : शेतकऱ्यांनी डोळे वटारल्यानंतर सरकार घाबरत असेल तर धडाधड त्यांचे उमेदवार पाडावेत. त्याशिवाय विद्यमान नव्हे तर कोणतेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार निवडणुकीत पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग आली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणात सतत बदल होत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे या पार्श्वभूमीवर आज शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आपली भूमिका चित्रफितीद्वारे मांडली. कांदा निर्यातीला परवानगी द्यायची आहे तर अटी कशाला घालता, असा प्रश्न उपस्थित करून शेट्टी यांनी जितका कांदा निर्यात व्हायचाय तितका तो होऊ द्यावा. त्याबाबतची मर्यादेंची बंधने काढून टाकावीत, अशी मागणी केली.

हेही वाचा…सतेज पाटील उमेदवार आहेत का? खासदार संजय मंडलिक यांनी पुन्हा डिवचले

लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्याचे घाटत आहे. असे होत असेल तर या निर्णयाचे स्वागत करतो, असा उल्लेख करून शेट्टी म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदी विरोधात सातत्याने आंदोलन करीत आहेत. याबाबत केंद्र सरकारकडे अनेक निवेदने पाठवली गेली आहेत.आंदोलन होत असताना आणि शेतकरी रस्त्यावर उतरत असतानाही सरकार काहीही ऐकायला तयार नव्हते. पण लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारला जाग आली आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.