कोल्हापूर : कविवर्य सुरेश भट यांच्या एका कवितेत ‘इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ असे उद्धृत केले आहे. परंतु कोल्हापुरातील महापालिकेच्या अनास्थेमुळे येथे मरणानंतरही सुटका होणे दूर, उलट मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे. शेणीचा तुटवडा हे त्याचे मुख्य कारण असल्याने महापालिकेच्या या गलथान कारभारावर नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
खरे तर कोल्हापूर महापालिकेने अंत्यविधी नि:शुल्क करण्याची सोय केली आहे. अंत्यविधीसाठी लागणारे शेणी, अन्य साहित्य महापालिकेकडून उपलब्ध केले जाते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थांकडूनही शेणीपुरवठा सेवावृत्तीतून केला जातो. परंतु, आपणच सुरू केलेल्या चांगल्या सुविधेचे आपणच मातेरे करीत आहोत याचे मात्र महापालिकेला विस्मरण झाले आहे.
शहरातील पंचगंगा, कदमवाडी, कसबा बावडा आणि बापट कॅम्प येथील स्मशानभूमींमध्ये नियमितपणे अंत्यसंस्कार होतात. पंचगंगा स्मशानभूमी सर्वांत जुनी असून, शहरासह उपनगरातील मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे शेणीचा तुटवडा असून, संपूर्ण गोदाम शेणीअभावी ओसाड पडले आहे. काही दिवस पुरतील इतक्याच शेणी येथे असल्याने अन्य स्मशानभूमींतून शेणी मागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कदमवाडी आणि कसबा बावडा येथेही शेणींची कमतरता असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
पंचगंगा स्मशानभूमीत दररोज १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. एका मृतदेहास सुमारे ५५० शेणी लागतात. दररोज ७ हजार शेणींची मागणी असते. शेणी उपलब्ध नसल्याने एका मृतदेहाच्या नातेवाइकांना दोन तास प्रतीक्षा करावी लागली. कसबा बावड्यातून शेणी आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे नातेवाइकांकडून महापालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून मूलभूत सुविधांबाबतची ओरड कायम आहे. पण किमान अंत्यसंस्काराच्या बाबतीत तरी महापालिकेच्या निष्काळजी प्रवृत्तीमुळे अशी वेळ यायला नको होती, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेणी तुटवड्याची स्थिती निर्माण झाल्यानंतरच महापालिकेने खरेदीसाठी निविदाप्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’ ही महापालिकेची सवय पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, शहरातील दानशूर संस्था, मंडळे आणि नागरिकांनी शेणीदान मोहीम राबवण्याची गरज असून, पुरेशा शेणी उपलब्ध न झाल्यास अंत्यसंस्कार प्रक्रिया गंभीर अडचणीत येऊ शकते. शेणी तुटवड्याबरोबरच गोदामाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर आहे. इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून, कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेणी साठवण्यासाठी त्वरित नव्या सुरक्षित गोदामांची आवश्यकता असल्याची मागणीही होत आहे.
अंत्यसंस्कारासाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. स्मशानभूमीत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. उपलब्ध स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे.
