कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात आबालवृद्धांनी सोमवारी लाडक्या गणरायला निरोप दिला. गेल्या पाच दिवसांपासून घराघरात असणारी गौरी गणपतीची लगबग आज संपली. काही वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, संस्था तसेच स्थानिक प्रशासनही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य देत आहे. या संस्थांना साद घालत पंचगंगा घाटावर लाखे भक्तांनी लाडक्या बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करुन गणेशमूर्ती महापालिकेकडे सुपूर्द केल्या.

पंचगंगा घाट संवर्धन समितीच्यावतीने पंचगंगा घाटावर गणेश विसर्जनासाठी आठ कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. या कुंडात गणेशमूर्ती विसर्जित करुन त्या समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या. या समितीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी पंचगंगा नदीतील गाळ काढण्यात आला होता. नदी पुन्हा प्रदूषित होऊ नये यासाठी या कुंडात गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले. पंचगंगा घाटावरील कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तीचे इराणी खणीत विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती इराणी खणीत नेण्यासाठी महापालिकेच्या वतीने दहा ट्रॅक्टरची सोय करण्यात आली होती. हजारो  भक्तांनी पर्यावरणासाठी सामाजिक संस्थांना सहकार्य केले.

निर्माल्यातून खतनिर्मिती

एकटी संस्थेतील कचरावेचक महिला कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाटावरही निर्माल्य, प्लॅस्टिक, कुजणारा कचरा, नैवेद्य असे निर्माल्य कचऱ्यांचे  अलगीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. गणेशमूर्तीबरोबरचे सर्व निर्माल्य नदीत टाकू नये असे आवाहन  करण्यात आले. चार ते पाच प्रकारचा हा कचरा खत प्रकल्पासाठी पाठवण्यात आला. एक टी संस्थेच्या ४०  महिला कार्यकर्त्यां हे काम करत होत्या. यावेळी शबाना पन्हाळकर, वनिता कांबळे, पुष्पा पाठारे, माधुरी डिगे, वंदना कुरणे आदींसह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.