कोल्हापूर : आता फक्त मरण स्वस्त आहे. त्याला जीएसटी कधी लावता, असा उपरोधित प्रश्न उपस्थित करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी केंद्र शासनाच्या जीएसटी निर्णयावर टीका केली आहे. जीएसटी परिषदेने अन्नधान्य, दही, पनीर, लस्सी, मध, सुकामेवा, कोरडे सोयाबीन, गहू यासारख्या कृषीपूरक उत्पादनावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावणारा असल्याने यावर विरोधकांनी केंद्र शासनावर तीक्केची तोफ डागली आहे. याच मुद्द्यावरून माजी खासदार शेट्टी यांनीही केंद्र शासनावर समाज माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘ पेट्रोल, डिझेल, गॅस महाग. शिक्षण आवाक्या बाहेरचे. दवाखाना परवडत नाही. तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही, साखर पुस्तके या साऱ्यांनाच जीएसटी. आता स्वस्त आहे फक्त मरण; त्याला केव्हा लावता जीएसटी.’ असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे.