ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नाही. तपास अपूर्ण आहे. दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये भक्कम पुरावे नाहीत. दोषारोपपत्रामध्ये दाखवलेले पुरावे हे तकलादू व कमकुवत आहेत. अन्य पर्यायांनी जर तपास केला तर पानसरे हत्येचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त पोलीस उपाधीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला. यामुळे या प्रकरणाचा योग्य तपास होण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास केंद्रीय यंत्रणेने करावा अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली.
आज शहीद गोिवदराव पानसरे विचारमंचच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत ते होते. अध्यक्षस्थानी चंद्रकांत यादव होते.
केवळ जनतेची समजूत काढण्यासाठी हे दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. पानसरे हे केवळ अंधश्रद्धा व सनातन विरोधात काम केल्याचा पर्याय डोळय़ांसमोर ठेवून तपास करत होते. मात्र ३० डिसेंबर रोजी पानसरेंनी ‘हू किल्ड करकरे’ या विषयाचे राज्यभर व्याख्यान घेण्याचे जाहीर केल्यानंतरच त्यांचा खून झाला असून, ही शक्यता पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
ही शक्यता तपासल्यास २००८ सालचा मालेगाव बॉम्बस्फोट, करकरे, पानसरे यांमागील खरे गुन्हेगार समोर येतील असेही त्यांनी सांगितले. हल्ल्यानंतर पानसरेंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती याला त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही दुजोरा दिला होता. मग त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचा घाट का घातला, असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला. पानसरेंना मुंबईला उपचारासाठी हलविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, पानसरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर डॉ. थोरात व शहाणे यांच्यामार्फत दबाव आणल्याचे त्यानी सांगितले. हे सत्य जगासमोर येण्यासाठी १६ फेब्रुवारीनंतरचे मुख्यमंत्री, डॉ. शहाणे, डॉ. थोरात यांच्यासह एस्टर आधारच्या कॉल नोंदी तपासण्याची मागणीही मुश्रीफ यांनी केली.
    प्रचंड पोलीस बंदोबस्त
    शमशुद्दीन मुश्रीफ यांचे व्याख्यान शाहू स्मारक भवन येथे होणार असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. प्रेक्षकांमध्ये प्रत्येक रांगेत एक-दोन साध्या वेषातील पोलीसही तनात केले होते.