दयानंद लिपारे, कोल्हापूर

इचलकरंजी शहर आणि परिसरातील हजारो यंत्रमाग कारखाने महापुराचा लाटेत सापडल्याने सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. आठवडाभर यंत्रमाग पाण्यात बुडल्याने त्यांना गंज चढला असून ते दुरुस्त होऊन पूर्ववत सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजडण्याची चिन्हे आहेत. उत्पादित कापड, निर्मितीच्या प्रक्रियेत असलेले, सुताचा साठा, विद्युत साहित्य, बांधकाम अशा विविध प्रकारच्या नुकसानीच्या संकटात यंत्रमागधारक सापडले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ात आलेल्या महापुराचा फटका इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योगाला मोठय़ा प्रमाणात बसला आहे. सुमारे दहा हजार यंत्रमाग कारखान्यात पुराचे पाणी गेल्यामुळे सुमारे ११० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर रांगोळी, रेंदाळ, हुपरी, पट्टण कोडोली, चंदूर, कबनुर, रुई, शिरदवाड आदी ग्रामीण सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका जुन्या पद्धतीच्या साध्या यंत्रमागला बसला आहे.

साध्या यंत्रमागाबरोबरच प्रत्येकी ३० ते ४० लाख रुपये किमतीच्या अत्याधुनिक आणि स्वयंचलित असे शटललेस (धोटा विरहित) असे सिमको, रेपियर, एअर जेट प्रकारच्या मागाच्या कारखान्यानेही पाण्यात गेल्याने यंत्रमागधारकांना तर कोटीच्या घरात झळ बसली आहे.

यंत्रमाग ठप्प

महाराष्ट्राची मँचेस्टरनगरी महापुरामुळे ठप्प झाली आहे. नेहमी खडखडाट करणारे यंत्रमाग महापुराच्या पाण्याने बंद पडलेत. त्याचे सुटे भाग बदलल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे दीड- दोन महिने हा उद्योगच ठप्प राहणार आहे.

महादेवी मिरजे या महिलेने जिद्दीने उभा केलेला यंत्रमाग कारखाना पाण्यात गेला आहे. कर्ज, त्यात आर्थिक मंदी, शासनाच्या सवलती कागदावर राहिलेल्या आणि आता महापुराचे संकट यामुळे सगळंच उद्ध्वस्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजी थब्बे या यंत्रमागधारकांची अवस्था याहून वेगळी नाही. त्यांच्या सगळे यंत्रमाग पाण्यात गेले आहेत. सरकारने मदत नाही केली तर मात्र आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची उद्विग्नता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते.

चार हजार यंत्रमागांना फटका

२५६ कारखान्यांत पाणी आल्याची नोंद इचलकरंजी पावरलूम असोसिएशनकडे आहे. या कारखान्यांमध्ये ३७९८ यंत्रमाग आहेत. यंत्रमाग कारखान्याचा आकडा चारशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मंदीत सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला पुरामुळे आणखीनच  फटका बसला आहे.

इचलकरंजीतले नदीकाठाचे हजारो यंत्रमाग उद्योग सध्या अडचणीत आहेत. त्यांचे पुनर्वसन झाले नाही तर इचलकरंजीचे मँचेस्टर नावच पुसले जाईल.

–  सतीश कोष्टी, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष