कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आमदार पाटील यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला. एकमेकांच्या तब्येतीवर टीका टिपणी करू नये, असा उल्लेख करून पाटील म्हणाले, १२ कोटी जनता असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याचे अनेक प्रश्न, विषय असतात. कालची बैठक महत्त्वपूर्ण असताना राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील यांना पाठवले. देशाच्या सगळय़ा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असताना आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. राज्याच्या हितासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. महत्त्वपूर्ण निर्णय करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणे पुरेसे नाही. सगळय़ा मुख्यमंत्र्यांनी तसेच केले असते. मुख्यमंत्री म्हणजे भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे होय. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी खरेच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे, अशी टिपणी त्यांनी केली. शिवसेनेला संपवण्याचे नियोजन मुंबै बँकेत राष्ट्रवादीने अध्यक्षपद पदरात पाडून घेतले पण शिवसेनेचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत कसा होतो? असा प्रश्न उपस्थित करून, शिवसेनेला पूर्णपणे संपवण्याचे एक नियोजन चालले आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात, असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. शिवसेना तोंड फोडून घेतेय.. शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्यास निघाली आहे. त्यांना असं तोंड फोडून घेण्याची, अनामत रक्कम घालवण्याची सवयच आहे. वेगवेगळय़ा राज्यात मतांची संख्या वाढून एक अखिल भारतीय पक्ष व्हायला त्यांना मदत होणार आहे. पण त्यासाठी सगळय़ा ठिकाणी तुमचंही तोंड फोडून का घेत आहात? हा प्रश्न पाटील शिवसेनेला उद्देशून केला.