कोल्हापूर : गेल्या आठ वर्षात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. जगात पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास आलेला आहे. मोदी यांची ध्येयधोरणे पाहता भारत २०३० पर्यंत जपान, जर्मनीच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कागल येथे आयोजित केलेल्या बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख व शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शिंदे म्हणाले , महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडे कोणतीही दूरदृष्टी नाही. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करत सुटले आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आताच फार मोठा पुळका आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे , देशाचे दैवत नाही तर ते संपूर्ण विश्वाचे दैवत असुन त्यांच्या कर्तृत्वाचा जागर संपूर्ण विश्वात निर्माण करण्याचा ध्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. स्वागत पर भाषणात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल येथील पंचतारांकित एमआयडीसीत भयाचे वातावरण निर्माण झाले असल्याने मोठे उद्योग येण्यास तयार नाहीत.सहाजिकच स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यास अडचणी येत आहेत.या प्रकरणी मंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे अशी विनंती केली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांना कमळाची साथ यावेळी असल्याने विधानसभा निवडणुकीत राजेंना फारशी अडचण नाही. माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले , केंद्र सरकारच्या योजना जनमांनसापर्यंत पोहोचविण्यासाठी बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांनी सज्ज राहावे.