मार्च सुरू होण्यापूर्वीच कोल्हापुराचा पारा चांगलाच चढला असताना शहरवासीयांना पाणी कपातीमुळे पाणी मिळविण्यासाठी वणवण भटकंती करावे लागत आहे. जूनअखेर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असल्याने धरणातून मर्यादित स्वरूपात पाणी सोडले जात असल्याने पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणीपुरवठा विभागाने तब्बल तीस टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे. शहराच्या निम्म्या भागातील पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला आहे. विशेषत: ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, त्या भागात मागणी होताच पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येते होते. एकूण आठ टँकर त्यासाठी तैनात करण्यात आले होते.
या वर्षी कोल्हापूर जिल्हय़ात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणीसाठय़ात ३० ते ३५ टक्के इतकी कमतरता जाणवत आहे. उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत वापरावे लागणार आहे. जूनअखेरचा अंदाज करून धरणातून मर्यादित पाणी सोडले जात आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. जलसंपदा विभागाने राधानगरी धरणातील पाणी भोगावती व पुढे पंचगंगा नदीत सोडले नसल्याने त्याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम जाणवू लागला आहे.
िशगणापूर बंधाऱ्याजवळ ही पातळी कमी झाल्याने पाणी उपसा नेहमीपेक्षा खूपच कमी झाला. या बंधाऱ्याजवळील चार पंपांपकी दोनच सुरू आहेत, तर कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जलवाहिनीद्वारे नेण्यात येणाऱ्या पाण्यातही पंचवीस टक्के कपात झाली. पुईखडी व कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी वॉर्डातील पूर्ण भाग आणि ई वॉर्डातील निम्म्या भागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. राधानगरीतून ५०० क्युसेक पाणी सोडले. पाणी आल्यानंतरच मूळ स्थिती होणार आहे. पाणीपुरवठा लवकरच पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. ए वॉर्ड तसेच सी व डी वॉर्डातील पाणीपुरवठय़ावर परिणाम जाणवला नाही. जरी पाणीपुरवठय़ात तीस टक्के कपात झाली असली तरी त्याची फारशी तीव्रता शहरवासीयांना जाणवली नाही.