भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक अजिंक्यपद, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय मल्ल चांगली कामगिरी करत आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपग स्पर्धेतही भारतीय मल्लांनी सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. या पार्श्वभूमीवर पदकविजेतच्या खेळाडूंचा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलत असताना बजरंगने ही मागणी केली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण यांनी कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीला आपलं समर्थन देताना बजरंग म्हणाला,”माझ्या मते कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळायला हवा. गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाच्या स्पर्धांमध्ये कुस्ती भारताला हक्काची पदकं मिळवून देत आहे.” दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या सुशील कुमारनेही या मागणीला पाठींबा दर्शवला आहे.

“क्रीडामंत्री या नात्याने मला भारतामधील सर्व खेळांविषयी आस्था आहे. सर्व खेळ आणि खेळाडू माझ्यासाठी महत्वाचे आहेत, पण मला एकतर्फी होऊन चालणार नाही. कुस्ती हा भारतासाठी महत्वाचा खेळ आहे, ऑलिम्पिकमध्ये कुस्तीने भारताला नेहमी पद मिळवून दिलं आहे. पण मला ऑलिम्पिक खेळांसोबत इतर पारंपरिक खेळांना समान न्याय द्यायचा आहे.” योगेश्वर दत्त आणि अन्य मान्यवरांच्या मागणीवर किरेन रिजीजू यांनी आपलं मत मांडलं.