BCCI च्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीला अधिक कार्यकाळ मिळावा यासाठी बीसीसीआयने पहिलं पाऊल टाकलं आहे. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, लोढा समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या शिफारसींमध्ये बदल करण्यावर एकमत झालं आहे.

लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना कोणतंही पद भूषवण्यासाठी Cooling-off period ची अट घालून दिली आहे. या अटीनुसार कोणत्याही पदाधिकाऱ्याने राज्य किंवा BCCI मध्ये ३ वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले असतील, त्याला पुढील ३ वर्ष कोणतंही पद भूषवता येणार नाही. बीसीसीआयचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यामुळे सौरवचं अध्यक्षपद हे औटघटकेचं ठरणार होतं. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या नियमांत बदल करण्यावर एकमत झालेलं आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आलेले सर्व निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीसाठी पाठवण्यात येतील असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

२३ ऑक्टोबररोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतलेल्या सौरव गांगुलीला सध्याच्या शिफारसींनुसार पुढील वर्षात आपलं पद सोडावं लागणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयने सुचवलेल्या बदलांना मान्यता दिल्यास सौरव २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदी राहु शकतो. मध्यंतरी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनीही, एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाचा संघटनेला फायदा होणार असेल तर त्याला Cooling-off period देण्यात काय अर्थ उरतो?? असा सवाल केला होता.