बीसीसीआयने भारताच्या आगामी विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेतून महेंद्रसिंह धोनीला विश्रांती दिली आहे. यानंतर क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर संघनिवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेकांनी हा धोनीपर्वाचा अस्त आहे का? असा सवालही विचारला. मात्र यानंतर निवडसमितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी स्पष्टीकरण देत धोनीचं करिअर संपलेलं नाही असं स्पष्टीकरण दिलंय.

“आम्हाला दुसऱ्या यष्टीरक्षकाबद्दलचे पर्याय धुंडाळून पहायचे आहेत, यासाठी आगामी दोन दौऱ्यांमध्ये आम्ही धोनीचा संघात समावेश केला नाही. या कारणासाठी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संघात जागा देण्यात आलेली आहे. या दोघांनाही मालिकेत यष्टीरक्षण व फलंदाजीची संधी मिळेल. मात्र याचा अर्थ धोनीचं करिअर संपलं असा होत नाही.” पत्रकार परिषदेत प्रसाद यांनी धोनीच्या निवडीबद्दल आपली बाजू स्पष्ट केली.

प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही धोनीच्या चाहत्यांनी कालपासून सोशल मीडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.