भारताचे माजी क्रिकेपटू बापू नाडकर्णी यांचं मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. रमेश गंगाराम नाडकर्णी असं त्यांचं नाव होतं. त्यांना बापू नाडकर्णी असं संबोधलं जाई. 16 ते 21 डिसेंबर रोजी न्यूझीलंड विरोधात दिल्लीमध्ये जो कसोटी सामना झाला त्या सामन्यातून बापू नाडकर्णी यांनी क्रिकेटविश्वात पदार्पण केले. त्यांच्या गोलंदाजीच्या खास शैलीमुळे त्यांची क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण झाली होती. आपली खास ओळख निर्माण करणारे बापू नाडकर्णी यांचे आज मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले.

बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने क्रिकेटविश्वातला एक तारा निखळल्याची भावना क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांची ख्याती होती. कसोटीत सलग 21 षटकं निर्धाव (मेडन) टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. बापू नाडकर्णी हे डाव्या हाताने फिरकी गोलंदजी करत असत. इंग्लंडविरोधातल्या सामन्यात बापू नाडकर्णी यांनी 32 षटकं टाकली होती. त्यापैकी 27 षटकं निर्धाव होती. 32 षटकांच्या त्यांनी अवघ्या पाच धावा दिल्या होत्या.

जगातल्या सगळ्यात कंजुस गोलंदाजांमध्ये बापू नाडकर्णी यांचा चौथा क्रमांक लागतो. इंग्लंडचे विल्यम एटव्हेल, इंग्लंडचे क्लिफ ग्लॅडव्हिन आणि दक्षिण अफ्रिकेचे ट्रेव्हर गॉडर्ड हे तिघे आघाडीवर आहेत.

बापू नाडकर्णी हरहुन्नरी खेळडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत कधीही चूक करत नसत असं  क्रिकेटचे पंडित म्हणत. प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर अनेकांनी त्यांना सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून मानले आहे.

खेळपट्टीवर एक नाणे ठेवून ओळीने ५० वेळा उडविणारे म्हणूनही बापू प्रसिद्ध आहेत. सन १९६०-६१ मध्ये पाकिस्तान विरूद्ध कानपूर येथील सामन्यात त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण ३२ षटकात २४ निर्धाव २३ धावा ० बळी असे होते तर पुढील दिल्लीच्या सामन्याचे चित्र ३४-२४-२४-१ असे होते. इंग्लंड विरुद्ध १९६४ साली मद्रास येथे झालेल्या सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी ३२-२७-५-० अशी होती. यातही बापूंनी २१ षटके सलगपणे निर्धाव टाकली आहेत.