नवी दिल्ली : भारताची ट्वेन्टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील वादाच्या पाश्र्वभूमीवरआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले आहे.

संघव्यवस्थापन आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी मिळून मितालीला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय संघ त्या सामन्यात पराभूत झाल्याने हा निर्णय अंगलट आला होता. त्यावरून संघ व्यवस्थापन, कर्णधार हरमनप्रीत आणि मिताली यांच्यात वाद उफाळून आला. या प्रकरणानंतर प्रशिक्षक रमेश पोवार यांची गच्छंती झाली.

त्या विश्वचषकानंतर हरमनप्रीत ही बिग बॅश लीगचे सामने खेळली. मात्र भारतीय संघात परतल्यानंतर पुन्हा तिच्या आणि मितालीच्या संबंधांबाबत चर्चा रंगली. नवीन प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही ती या ताणतणावांना कंटाळली होती. त्याच वेळी तिच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने ती आपसूकच काही काळ क्रिकेटपासून दूर राहिली होती.

न्यूझीलंड दौऱ्यावरील दुखापतीमुळे मला आवश्यक असलेली मानसिक ताणतणावांपासूनची विश्रांती मिळाली. त्या निमित्ताने ड्रेसिंग रूममधून मिळालेली विश्रांती मला पुरेशी वाटत नाही. मला खेळण्यातून आनंद मिळत नसेल, तर  मी संघातील एक ज्येष्ठ खेळाडू आहे, इतक्या कारणास्तव संघातील जागा अडवू इच्छित नाही.