ICC World Cup २०१९ ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मी पासून होणार आहे. या स्पर्धेसाठी सारे संघ कसून परिश्रम करत आहेत. आपल्या तंदुरुस्तीवर आणि शारीरिक स्वास्थ्यावर विशेष लक्ष पुरवत आहेत. पण या दरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंना अजूनही बिर्याणीचा आहार देण्यात येत असल्याने पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम चांगलाच भडकला आहे.

पाकिस्तानचा संघ काही दिवसात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत आता त्यांना विशेष लक्ष द्यायला हवे. मात्र पाकिस्तानचे खेळाडू अजूनही बिर्याणी आणि त्या प्रकारचा आहार करण्यात मग्न आहेत. अशा पद्धतीचा आहार सुरु राहिला, तर पाकिस्तानचे खेळाडू विश्वचषकात इतर संघांशी दोन हात कसे करणार? असा सवाल अक्रमने केला आहे.

विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटमधील जाणकार भारत आणि इंग्लंड या २ संघाना विजेते म्हणून पसंती देताना दिसत आहेत. काही क्रिकेट पंडित न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडेही विजेते म्हणून पहात आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर सर्वच संघांतील खेळाडूंना दुखापतीपासून दूर राहण्याचे आव्हान आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी अनेक वेळा खेळाडूंची तंदुरुस्ती हा नेहमी चिंतेचा विषय ठरला आहे. असे असताना पाकिस्तानी क्रिकेट मंडळ आणि व्यवस्थापन खेळाडूंच्या आहार पद्धतीबाबत इतके बेजबाबदार कसे वागतात, असा प्रश्न अक्रमने उपस्थित केला.

पाकिस्तानचे विश्वचषकातील सामने –

३१ मे – वि. वेस्ट इंडिज, ट्रेंट ब्रिज
३ जून – वि. इंग्लंड, ट्रेंट ब्रिज
७ जून – वि. श्रीलंका, ब्रिस्टोल
१२ जून – वि. ऑस्ट्रेलिया, टाँटन
१६ जून – वि. भारत, ओल्ड ट्रॅफोर्ड
२३ जून – वि. दक्षिण आफ्रिका, लॉर्ड्स
२६ जून – वि. न्यूझीलंड, एडबॅस्टन
२९ जून – वि. अफगाणिस्तान, हेडिंग्ले
५ जुलै – वि. बांगलादेश, लॉर्ड्स