ICC World Cup 2019 IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संयमी सुरुवात केली. या दरम्यान दुसऱ्याच षटकात एक किस्सा घडला. रोहित शर्माचा एक झेल नॅथन कुल्टर-नाईलने अप्रतिम उडी मारून टिपण्याचा प्रयत्न केला, पण रोहितच्या नशिबाने त्याला साथ दिली.

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा २ धावांवर खेळत होता. त्यावेळी लेगच्या दिशेने फटका लगावला. तेव्हा चेंडू हवेत होता. नॅथन कुल्टर-नाईल याने अप्रतिम उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू कुल्टर-नाईल झेलता आला नाही. रोहितचे नशीब बलवत्तर ठरले.

दरम्यान, या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्याही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघांनी आपला गेल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.गेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हीच विजयी लय कायम राखण्यासाठी भारतीय संघ आतुर असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. या पूर्वीच्या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असल्याने भारतापुढे हे कडवे आव्हान आहे.

विश्वचषकात भारतावर अधिराज्य गाजवणारा ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत असला तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला रविवारी केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. जवळपास वर्षभर संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर  गेल्या काही महिन्यांत आपली कामगिरी उंचावली आहे. विश्वचषक स्पर्धेतही अफगाणिस्तान आणि विंडीजविरुद्धचे सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने आपण सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.