ICC World Cup Squad 2019 या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक यालाच निवड समितीची पसंती मिळाली आहे. तसेच हार्दिक पांड्या याच्या समवेत आणखी एक वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला रायडूपेक्षा प्राधान्य देण्यात आले. याशिवाय, लोकेश राहुल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभावी दिसला नाही. मात्र गेल्या काही काळात देशांतर्गत स्पर्धामध्ये आणि IPL मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद असून देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा हे या समितीचे सदस्य आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय संघाची निवड करणारे हे सदस्य फारसे क्रिकेट खेळलेले नाही. या सदस्यांनी मिळून केवळ २५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

एमएसके प्रसाद – ४३ वर्षीय प्रसाद हे यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. यात त्यांनी सहा शतकं ठोकली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसाद यांनी एकूण ६ कसोटी आणि १७ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या केवळ १३१ धावा असून ६३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

देवांग गांधी – देवांग गांधी हे ४७ वर्षांचे आहेत. त्यांनी एकूण ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ३ सामन्यात देवांग यांनी केवळ ४९ धावा केल्या आहेत.

शरणदीप सिंह – शरणदीप सिंह यांना एकूण ३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. शरणदीप यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ ४७ धावा केल्या आहेत.