ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची फलंदाजीच चांगलीच कोलमडली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. यानंतर लोकेश राहुलने विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये एका प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. विराटने आजच्या सामन्यात २४ धावांची खेळी केली. १२ वी धाव काढून विराटने न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलचा विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर आता ५०३ धावा जमा झाल्या आहेत.

मात्र विराट कोहली माघारी परतल्यानंतर भारतीय संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताने अखेरीस १२६ धावांपर्यंत मजल मारली. धोनीचा अपवाद वगळता मधल्या फळीतला एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. धोनीनेही खेळपट्टीवर तग धरत भारताचा डाव सावरला, मात्र यादरम्यान त्याने अनेक चेंडू वाया घालवले. त्याच्या या संथ खेळीमुळे सोशल मीडियावर धोनी पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे.