भारतीय संघ २६ डिसेंबरपासून तिसरी कसोटी मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा या दोन फलंदाजांना तर रवींद्र जाडेजा या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. पण या बदलानंतरही कर्णधार विराट कोहलीला मात्र एक चिंता सतावत आहे. ती चिंता म्हणजे फिरकीपटू नॅथन लॉयनचा फॉर्म.

नॅथन लॉयन

 

नॅथन लॉयन हा उत्तम गोलंदाज आहे. तो सातत्याने एकाच टप्प्यावर मारा करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आमच्या संघातील फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर अधिकाधिक धावा करण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे आहे. कारण त्याला एका बाजूने सतत गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास तो अधिक घातक गोलंदाज ठरतो, अशी भीती विराटने व्यक्त केली.

एखाद्या मालिकेत कोणता गोलंदाज उत्तम गोलंदाजी करत आहे आणि कोणता गोलंदाज धावा मिळवण्यासाठी फलंदाजांना जास्त कष्ट घेण्यास भाग पाडत आहे, याचा प्रतिस्पर्धी संघाने सतत अभ्यास केला पाहिजे. तसे झाले तरच त्या गोलंदाजांविरुद्ध काही योजना आखता येतात. लॉयनने या मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भारतीय संघापुढे त्याचे आव्हान असणार आहे, असेही विराट म्हणाला.