भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला.

Video : अशी उडाली बांगलादेशच्या संघाची दाणादाण

दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. उमेश यादवने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला, तर त्याला इशांत शर्माने ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत ९ गडी बाद करत भारताने ऐतिहासिक विजय साकारला. या सामन्यात एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे नेटिझन्स चांगलेच संतापले. सामन्याचे समालोचन करणारे अनुभवी हर्षा भोगले आणि माजी क्रिकेटपटू व सध्याचे समालोचक संजय मांजरेकर या दोघांमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये मतभेद झाल्याचे दिसले. या मतभेदात संजय मांजरेकरने हर्षा भोगलेचा अपमान केल्याची भावना नेटिझन्समध्ये दिसून आली आणि त्यामुळे संजय मांजरेकरला रोषाचा सामना करावा लागला.

Video : बाबोsss ….. एकदम सिक्स कसा काय गेला?; ‘तो’ फटका पाहून कोहली अवाक

सामन्यादरम्यान मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. “गुलाबी चेंडूवरील कसोटीचे योग्य परिक्षण व्हायला हवे. खेळाडूंना त्या चेंडूवर नीटपणे खेळता येत आहे की नाही हे त्यांना विचारायला हवे”, असे मत हर्षा भोगलेने व्यक्त केले होते. मात्र त्यावर हर्षा भोगलेचे वाक्य अर्ध्यातच तोडत त्यावर संजय मांजरेकरने त्वरित उत्तर दिले. तो म्हणाला की याबाबतच्या गोष्टी केवळ तुला विचारायला हव्या. कारण आमच्याकडे क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे.”

संजय मांजरेकर याच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सने त्यांना धारेवर धरले.

दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. सलामीवीर शदमन इस्लाम (०) आणि इमरूल कयास (५) दोघे स्वस्तात बाद झाले. कर्णधार मोमिनुल हक शून्यावर माघारी परतला. मोहम्मद मिथून देखील पाठोपाठ ६ धावांवर माघारी परतला. मोहम्मदुल्लाह रिटायर्ड हर्ट झाला. त्याने ७ चौकारांसह ३९ धावा केल्या होत्या. नंतर मेहिदी हसन मिराजदेखील (१५) बाद झाला. मुश्फिकूर रहीमने याने मात्र एक बाजू लावून धरली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर तैजूल इस्लाम आणि एबादत हुसेन हे दोघे झटपट बाद झाले आहेत. मुश्फिकूर रहीमने अर्धशतक ठोकले, पण तो ७४ धावांवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १३ चौकार लगावले. अल-अमीन हुसेन याने ५ चौकार खेचत काही काळ मनोरंजन केले, पण अखेर तो झेलबाद झाला.