सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखत पूर्ण केलं. लोकेश राहुलने या सामन्यात ५६ तर विराट कोहलीने ४५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडीही घेतली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : राहुल, नाम तो सुना ही होगा ! संघाच्या विजयात बजावली मोलाची भूमिका

दरम्यान या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या इतिहासात दोन्ही संघातल्या ५ खेळाडूंनी अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी योग्य चेंडूवर फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लोकेश राहुलने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.