भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अनोखं अर्धशतक साजरं केलं आहे. मात्र हे अर्धशतक फलंदाज म्हणून नसून कर्णधार या नात्याने झळकावलं आहे. विशाखापट्टणम कसोटीत विराट कोहलीच्या भारतीय संघाने आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट नाणेफेकीसाठी मैदानात उतरला, नाणेफेक जिंकत विराटने या कसोटी सामन्यातही फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा हा ५० वा कसोटी सामना ठरला आहे. या यादीत विराटने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणारे कर्णधार –

  • महेंद्रसिंह धोनी – ६०
  • विराट कोहली – ५०*
  • सौरव गांगुली – ४९
  • सुनिल गावसकर/मोहम्मद अझरुद्दीन – ४७
  • मन्सूर अली खान पतौडी – ४०

यावेळी नाणेफेकीदरम्यान विराट कोहलीने आपल्याला भारतीय संघाचं नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल बीसीसीआय आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाचं ५० कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा विराट हा दुसरा कर्णधार ठरला आहे.