पहिल्या दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवल्यानंतर रांची कसोटीतही भारतीय संघाने धडाकेबाज खेळ केला आहे. सलामीवीर रोहित शर्माचं द्विशतक, अजिंक्य रहाणेचं शतक आणि अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ९ गड्यांच्या मोबदल्यात ४९७ डावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. रोहित शर्माने या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत २१२ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – Ind vs SA : रांचीच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची षटकारांची आतिषबाजी

कसोटी क्रिकेटमधलं रोहितचं हे पहिलंच द्विशतक ठरलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर ३ द्विशतकांची नोंद आहे. वन-डे आणि कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा रोहित शर्मा चौथा फलंदाज ठरला आहे.

रोहितने ९५ धावांवर असताना पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत शतक झळकावलं. तर दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपलं पहिलं द्विशतक झळकावलं. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून झळकावलेलं हे तिसरं द्विशतक ठरलं आहे. एका कसोटी मालिकेत भारताच्या ३ फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : ‘हिटमॅन’ची गाडी सुस्साट, सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला