भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला 253 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. अखेरचा वन-डे सामना 35 धावांनी जिंकत भारताने 5 वन-डे सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. तब्बल 10 वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडचा संघ 44.1 षटकात 217 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताप्रमाणे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोहम्मद शमीने दोन्ही सलामीवीरांना ठराविक अंतराने माघारी धाडलं. यानंतर केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्यात रंगलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना काहीकाळ अटीतटीचा होईल असं वाटतं होतं. मात्र लॅथम माघारी परतल्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. जिमी निशमने झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2-2 तर भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने प्रत्येकी 1 बळी घेतला. त्याआधी, अंबाती रायुडू, विजय शंकर, केदार जाधव आणि हार्दिक पांड्या या चार फलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात 252 धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. आघाडीच्या फळीतले 4 महत्वाचे फलंदाज अवघ्या 18 धावांत माघारी परतले. रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल हे फलंदाज आजच्या सामन्यातही अपयशी ठरले. दुखापतीनंतर संघात परतलेल्या धोनीलाही न्यूझीलंडने फारकाळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. यानंतर अंबाती रायुडूने विजय शंकरच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंनी संयमाने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दोघांमध्येही पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी झाली. चोरटी धाव घेण्याच्या नादात विजय शंकर धावबाद झाल्यानंतर रायुडूने केदार जाधवच्या साथीने खेळपट्टीवर जम बसवला. या दोन्ही खेळाडूंमध्येही सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी झाली. यानंतर हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारताला 250 धावांपर्यंत आणून सोडलं. पांड्याने 22 चेंडूत 45 धावा केल्या. यानंतर उर्वरित फलंदाज फारकाळ तग धरु शकले नाहीत. अखेरीस 1 चेंडू शिल्लक असताना भारताचा डाव 252 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4, ट्रेंट बोल्टने 3 तर जिमी निशमने 1 बळी घेतला. भारताचे 2 फलंदाज धावबाद झाले.