स्नेहल शिंदेच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीगमधील महिलांच्या गटात अंतिम फेरी गाठली. त्यांनी उत्कंठापूर्ण लढतीत रत्नागिरी रेडर्स संघावर २७-१२ अशी मात केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने पूर्वार्धात २७-१२ अशी भक्कम आघाडी घेतली होती, मात्र उत्तरार्धात रत्नागिरी संघाने खोलवर चढाया व धारदार पकडी असा खेळ करीत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, ठाणे संघाने शेवटपर्यंत आघाडी टिकविली. स्नेहल शिंदेने २६ गुण नोंदवत ठाण्याच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. आम्रपाली गलांडे व सोनाली इंगळे यांनी तिला चांगली साथ दिली. रत्नागिरी संघाकडून अपेक्षा टाकळेने एकटीने २० गुण मिळवत संघाला विजय मिळवून देण्यासाठी चिवट प्रयत्न केले.
अश्विनी शेवाळे व लता घरत यांनीही संघाचा पराभव टाळण्यासाठी झुंज दिली, परंतु त्यांचेही प्रयत्न अपुरे ठरले.