समीर, रितूपर्णाचे आव्हान संपुष्टात

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पदकापासून एका विजयाच्या अंतरावर आहेत. गुरुवारी या दोघांनीही एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.

२०१३ आणि २०१४मध्ये जागतिक कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूने एक तास आणि २७ मिनिटे रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत हाँगकाँगच्या चेयुंग नगान यि हिचा १९-२१, २३-२१, २१-१७ असा पराभव केला. २२ वर्षीय सिंधू दुसऱ्या गेममध्ये १३-१६ अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर दमदार मुसंडी मारत हा गेम जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत तिची चीनच्या सन यू हिच्याशी गाठ पडणार आहे.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसेनचा २१-१४, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कोरियाच्या सन वान हू याच्याशी त्याला आता झुंजावे लागणार आहे.

भारताच्या अजय जयरामने नेदरलँड्सच्या मार्क कॅलजॉवचा सरळ गेम्समध्ये पराभव करून  उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत १३व्या मानांकित जयरामने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानावरील कॅलजॉवचा ३३ मिनिटांत २१-१३, २१-१८ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या जयरामची पुढील फेरीत दोन वेळा विश्वविजेत्या चीनच्या चेन लाँगशी गाठ पडणार आहे.

सय्यद मोदी गँड्र प्रिक्स गोल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या समीरची वाटचाल खंडित झाली. २०१०मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या राजीव ऑसेफने त्याचा २२-२०, २१-९ अशा फरकाने पराभव केला.

महिला एकेरीत राष्ट्रीय विजेत्या रितूपर्णाला स्कॉटलंडच्या किस्र्टी गिल्मरचा अडथळा ओलांडता आला नाही. १६व्या मानांकित गिल्मरने ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत तिचा २१-१६, २१-१३ असा पराभव केला. महिला दुहेरीत चीनच्या १४व्या मानांकित बाओ यिझिन आणि यू शिओहान जोडीने भारताच्या संजना संतोष आणि आरती सारा सुनीलचा २१-१४, २१-१५ असा पराभव केला.