भारत विरुद्ध विंडीज यांच्यादरम्यानच्या मालिकेमधील अंतीम म्हणजेच पाचवा सामना त्रिवेंद्रम येथे खेळवला जात आहे. हा सामना सुरु होण्याआधी भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा विशेष सत्कार करुन त्याला ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला. असे असले तरी, या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश अद्याप का करण्यात आलेला नाही?, असा सवाल क्रिकेटरसिकांकडून पुन्हा उपस्थित केला जात आहे.

ICC च्या Hall of Fame च्या यादीमध्ये भारताच्या भिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे या चार खेळाडूंनंतर आज द्रविडचाही समावेश झाला आहे.

असे असतानाही सचिन मात्र अद्याप या यादीमध्ये नाही. अर्थात सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत हे वेगळे सांगायला नको. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने, कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजाराहून अधिक धावांबरोबरच इतरही अनेक विक्रम केलेल्या सचिनचा हा एवढा पराक्रम Hall of Fame मध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसा नाही का? असा प्रश्नदेखील क्रिकेट रसिकांच्या मनात घर करताना दिसत आहेत. पण या यादीत अद्याप सचिनचा समावेश करण्यात आलेला नाही. पण, यामागे एक वेगळेच कारण आहे.

Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. सचिन २०१३ साली १६ नोव्हेंबर रोजी वानखडे स्टेडीयमवर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. विंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने शेवटचा कसोटी सामना खेळून क्रिकेटला अलविदा केले होते. त्यामुळे या यादीत समावेश होण्याच्या निकषात बसण्यासाठी सचिनला अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

किमयागार फिरकीपटू आणि भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेचाही या यादीमध्ये २०१५ सालीच समावेश करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर पाच वर्षांनी समावेश होण्याची अट सचिन पूर्ण करत असला तरी Hall of Fame च्या यादीत कोणत्या खेळाडूला समाविष्ट करून घ्यायचे, याचा निर्णय पूर्णपणे आयसीसीच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो.