इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवाला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जबाबदार आहेत. त्यामुळे पदावरून तात्काळ दूर करा, असे विधान अशी मागणी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री चेतन चौहान यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी शास्त्री यांची हकालपट्टी करा, असे त्यांनी म्हटले आहे. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा पराभव झाला.

या स्पर्धेत अपेक्षित निकाल लागायला हवा. कारण भारतीय संघ हा संतुलित आहे. पण तसे झाले नाही. त्यामुळे शास्त्री यांना आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी पदावरून दूर केले पाहिजे. शास्त्री चांगले समालोचक आहेत. त्यांना तेच काम करू द्या. शास्त्री उत्तम समालोचक आहेत आणि त्यांना ती जबाबदारी पार पाडण्याची परवानगी द्यावी, असा खोचक टोमणा त्यांनी मारला.

विद्यमान भारतीय संघ हा परदेश दौरा करणाऱ्या आतापर्यंतच्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम आहे, असे वक्तव्य शास्त्री यांनी मध्यंतरी केले होते. त्याबाबत चौहान म्हणाले, की मला ते मान्य नाही. भारतीय संघाची कामगिरी खरे तर सरस व्हायला हवी होती. हे दोन्ही संघ तुलनेने समसमान ताकदीचे होते; पण भारतीय संघाने इंग्लंडच्या तळाच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले. मला विचारायचे झाले तर परदेश दौऱ्यावर सर्वाधिक यशस्वी ठरलेला संघ म्हणून मी १९८०च्या संघाकडे बोट दाखवेन, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मुख्य प्रशिक्षकपदावरून त्यांना हटवावे. चौहान यांच्याआधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग यांनीही शास्त्री यांना हटविण्याविषयी विधान केले होते.