रविवारपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघ या दौऱ्यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० संघासाठी भारतीय निवड समितीने ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन्ही यष्टीरक्षकांना संधी दिली आहे. विश्वचषकानंतर विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ऋषभ फलंदाजीत अपयशी ठरला होता. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांचा रोष ऋषभला सहन करावा लागला होता. यानंतर आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभला विश्रांती देण्यात आली. तरीही बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत ऋषभ पंत हाच भारताची पहिली पसंती असेल असं कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे.

पहिल्या सामन्याआधी रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना टी-२० मालिकेत पंतलाच संधी मिळणार असल्याचं रोहितने सांगितलं. “गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही ऋषभला संधी देत गेलो आणि नेमका याच प्रकारात तो अपयशी होत राहिला आहे. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमधूनच ऋषभ पंतने आपला खेळ सर्वांना दाखवून दिला आहे. त्यामुळे काहीकाळासाठी ऋषभला संधी देणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी तो चांगल्या फॉर्मात असतो त्यावेळी तो आक्रमक खेळ करतो हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे.”

ऋषभने आतापर्यंत फार-फार १०-१५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामुळे इतक्या कमी कालावधीच्या जोरावर तो चांगला खेळाडू आहे की नाही हे ठरवणं योग्य नाही. त्यामुळे पंतला अजुन संधी मिळणं गरजेचं आहे, रोहित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता. दरम्यान विश्वचषकानंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने ऋषभ पंत आगामी मालिकांसाठी भारताची पहिली पसंती असेल असं स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध मालिकेत तो फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध आगामी टी-२० मालिकेत ऋषभ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.