मनोहर यांच्याकडून बीसीसीआयची पाठराखण
न्यायमूर्ती लोढा समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास असमर्थ असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद सोडले, असा धक्कादायक खुलासा मावळते अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून मनोहर लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत. याकरिता त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
‘‘बीसीसीआयचे हित लक्षात घेऊन मी कार्यवाही केली. लोढा समितीने शिफारशी सादर करण्याआधीपासूनच मी कामाला सुरुवात केली होती. या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी मी सक्षम व्यक्ती नाही. संघटनेतील अन्य व्यक्ती या शिफारशींची अंमलबजावणी करू शकतील. असंख्य खेळाडू घडवणाऱ्या संघटना बरखास्त करण्याचा हा डाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या प्रशासन, पायाभूत सुविधा, आर्थिक स्थिती या आघाडय़ांवर भारत मजबूत आहे. याहून काय अपेक्षा आहेत? कोणतीही संघटना आदर्शवत असू शकत नाही. संघटनेत काम करणाऱ्या व्यक्ती संस्थेची प्रतिमा बदलू शकतात. संघटना चालवण्यासाठी चांगल्या व्यक्तींची आवश्यकता आहे, कायद्यांची नाही,’’ असे परखड मत मनोहर यांनी व्यक्त केले. लोढा समितीने सादर केलेल्या ७५ टक्के शिफारशींची अंमलबजावणी बीसीसीआयने केली आहे. मात्र काही मुद्यांवर आक्षेप असल्याने सर्वस्वी अंमलबजावणी झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.