इंडियन प्रिमीअर लीग म्हणजेच IPL ची भारतीय क्रिकेटपटूंमध्ये असणारी क्रेझ ही सर्वश्रुत आहे. सध्या भारताचा U-19 संघ न्यूझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळतो आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीरोजी बंगळुरुत रंगणार आहे. भारताच्या U-19 संघातील काही खेळाडूंना यंदाच्या लिलावात चांगल्या रकमेची बोली मिळण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल लिलावाऐवजी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे.

“होय, विश्वचषकाची स्पर्धा सुरु असली तरीही सध्या खेळाडूंमध्ये आयपीएलच्या लिलावाची चर्चा सुरु आहे. मात्र सध्या खेळाडूंचं लक्ष हे विश्वचषक स्पर्धेवर असणं गरजेचं आहे. आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. ESPNCricinfo या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविड बोलत होता.

अवश्य वाचा – न्यूझीलंडला नमवत अफगाणिस्तानची अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक

भारतीय U-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमन गिल, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, कमलेश नागरकोटी, शिवम मवी, अर्शदीप सिंह, हार्विक देसाई यासारख्या खेळाडूंना यंदाच्या लिलावात चांगली बोली लाण्याची शक्यता आहे. मात्र आयपीएल लिलावाच्या नादात खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध सामन्याची तयारी विसरु नये असा सल्ला राहुल द्रविडने आपल्या खेळाडूंना दिला आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची उपांत्य फेरीत पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.