विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या दोन संघाना मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाचं पाणी पाजलं. जसप्रीत बुमराहच्या जागी भारतीय संघात स्थान मिळालेल्या उमेश यादवने या मालिकेत आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. गोलंदाजीसह उमेशने अखेरच्या फळीत आक्रमक फटकेबाजी करत भारताची बाजू वरचढ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीने प्रभावित झालेल्या विराट कोहलीने एका मुलाखतीत उमेश यादवला फलंदातीत तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा विचार बोलून दाखवला.

“समजा, परदेशात खेळताना हार्दिक अष्टपैलू खेळाडू म्हणून दुखापतीमधून सावरला नाहीये, आणि तुम्ही एका फिरकीपटूसह ५ गोलंदाजांना खेळवता तेव्हा तुमची फलंदाजी तितकीच भक्कम आहे हे तुम्हाला माहिती असतं. आश्विन आणि जाडेजा संघात असल्यावर सातव्या क्रमाकांपर्यंत संघाची फलंदाजी मजबूत असते. सध्या उमेश यादव ज्या पद्धतीने खेळतो आहे, ते पाहता भविष्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावरही खेळवता येईल.” India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली बोलत होता.

बांगलादेशविरुद्ध मालिकेनंतर भारत घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळतील. २०१९ सालातला भारतीय संघाचा हा अखेरचा दौरा असणार आहे, यानंतर भारतीय संघ २०२० साली जानेवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये आपला पहिला परदेश दौरा करेल.