अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या विजयानंतर भारतीय संघावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वातील एक चूक शोधून काढली आहे. ESPNCricinfo या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत चॅपल बोलत होते.

अवश्य वाचा – वाहवत जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवा ! माजी प्रशिक्षक जॉन राईट यांचा भारतीय संघाला सल्ला

याआधीही विराट कोहली गोलंदाजीदरम्यान परिस्थितीनरुप योग्य बदल करत नाही असा आरोप अनेकांनी केला होता. मात्र इयान चॅपेल यांच्यामते केवळ विराटच नाही तर आताच्या घडीतले सर्व आधुनिक कर्णधार ही चूक करतात. “विराट कोहली हा एक उत्तम कर्णधार आहे. मात्र इतर कर्णधारांप्रमाणे तो देखील सीमारेषेजवळ जास्त क्षेत्ररक्षण लावतो. यामुळे फलंदाजांना एक-एक धाव घेण्यामध्ये मदत होते. यानंतर जेव्हा फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावतात मग त्यांना बाद करणं कठीण होऊन बसतं. पहिल्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी भारताला अशाच प्रकारे तंगवलं होतं.”

स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीमध्ये सध्या टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. चॅपल यांनी पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतरही टीम पेनला आपला पाठींबा दर्शवला आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियासाठी टीम पेन हा योग्य उमेदवार आहे. तो चांगला यष्टीरक्षक आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली फलंदाजीही करतो, त्यामुळे सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या संघात नेतृत्वबदलाची गरज नसल्याचं चॅपल यांनी स्पष्ट केलं. पर्थ कसोटी सामना जिंकल्यानंतर तब्बल १० वर्षांनी भारत ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला होता. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : पर्थवर ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं नाही – रिकी पाँटींग