विराट कोहली भारतासाठी 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. जानेवारी 2017मध्ये टीम इंडियाच्या तिन्ही प्रकारात कर्णधार ठरलेला कोहलीने पुण्यात पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ही खास कामगिरी केली.

कोहली आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या यादीत सामील झाला आहे. विराटपूर्वी, धोनी आणि अझरुद्दीन यांनी 200 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. अझरुद्दीनने 221 सामन्यांत तर, धोनीने 332 सामन्यांत कर्णधारपद सांभाळले आहे.

डिसेंबर 2014मध्ये धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कोहलीला भारतीय कसोटी संघाची कमान देण्यात आली. धोनीने जानेवारी 2017मध्ये मर्यादित षटकांचे कर्णधार पद सोडले. त्यानंतर कोहलीला तीनही स्वरूपात टीम इंडियाचा कर्णधार बनविण्यात आले.

असा झाला तिसरा सामना

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी सरशी साधली. या विजयासह कोहली ब्रिगेडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 322 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद 95 धावा करत टीम इंडियाचे टेंशन वाढवले, मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.