दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विशेषकरुन कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं. वन-डे क्रिकेटपाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्येही बुमराहने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचं कौतुक होणं गरजेचं असल्याचं निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी म्हटलंय. मात्र याचवेळी बुमराहवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी घेणंही आम्हाला तितकच गरजेचं वाटत असल्याचंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून बुमराहने १६२.१ षटकं गोलंदाजी केली. यातली ११२.१ षटकं ही ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहकडून टाकण्यात आली आहेत. त्याची ही कामगिरी आणि शाररिक कणखरता खरंच थक्क करणारी असल्याचं प्रसाद म्हणाले. मात्र येत्या वर्षात भारताचे परदेश दौरे आणि आयपीएलचा विचार केला असता बुमराहवर ताण तर येत नाही ना ही गोष्टही लक्षात घ्यावी लागेलं असं प्रसाद म्हणाले.

बुमराहच्या गोलंदाजीची शैली ही थोड्या वेगळ्या धाटणीची आहे. त्यात बुमराहचे यॉर्कर चेंडू खेळताना आजही भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडताना आपण मैदानावर पाहिलेलं आहे. त्यामुळे आयपीएलनंतर महत्वाच्या स्पर्धांमध्ये त्याला जास्तीत जास्त संधी मिळणार असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत.

अवश्य वाचा – देवधर चषकातून रविचंद्रन आश्विनची माघार, महाराष्ट्राच्या अंकित बावनेकडे भारत ‘अ’ संघाचं नेतृत्व