भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदीच्या कारवाईमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे राष्ट्रीय क्रीडा विकास निधीस दिलेली ५० कोटी रुपयांची देणगी परत करण्याची मागणी करण्याची शक्यता असल्याचे समजते.
ऑलिम्पिकमध्ये भारतास पदके मिळावित यासाठी बीसीसीआयने राष्ट्रीय क्रीडा विकास निधीस ५० कोटी रुपयांची देणगी दिली होती. या संदर्भात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, आयओएवरील बंदीच्या कारवाई संदर्भातील घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून होतो. आता जर आयओए अस्तित्वात राहणार नाही तर या निधीचा काय उपयोग होणार. त्यामुळेच हा निधी आम्हास परत करण्याची मागणी करणार आहोत. निधीचा योग्य रीतीने विनियोग होत नाही असे आमच्या लक्षात आले आहे. आम्ही दिलेल्या निधीबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता केवळ क्षुल्लक रकमेचा विनियोग केला असल्याचे समजले. या रकमेचा उपयोग काही अकादमींच्या नूतनीकरणासाठी केला असल्याचे सांगण्यात आले. एकूणच आयओएचा कारभार विनोदी रीतीने चालला असल्याचे आमच्या लक्षात आले.