माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळत आहेत. २०१९ विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा करार संपला होता, मात्र कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुन्हा एकदा रवी शास्त्री यांच्यावर विश्वास दाखवला. २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. सध्या करोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत, असं असलं तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने संधी मिळाल्यास भारतीय संघाचं प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल असं म्हटलं आहे.

“भारतीय संघासोबत काम करण्याची संधी मिळणार असेल, तर मी नक्कीच तयार आहे. संधी मिळाल्यास मी कशाचाही विचार न करता हे काम स्विकारेन. सध्याच्या घडीला अनेक जणं संघाच्या मदतीसाठी असतात हे पाहून मला खरंच नवल वाटतं. माझ्यापुरता विचार करायला झाला तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही माझी जमेची बाजू आहे. त्यामुळे भविष्यात मला ही संधी मिळाल्यास, संघाला वेगळ्या फलंदाजी प्रशिक्षकाची गरज लागणार नाही.” Gulf News ला दिलेल्या मुलाखतीत अझरुद्दीनने आपली इच्छा बोलून दाखवली.

लॉकडाउन काळात सध्या सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयनेही करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या काळात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. परंतू या स्पर्धेचं आयोजन करणं कठीण असेल असा मतप्रवाह अनेकांमध्ये पहायला मिळल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाल्याचंही बोललं जातंय.