रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत विदर्भाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर दिल्लीचा संघ आता आणखी एका कारणासाठी चर्चेत आला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघात निवड झालेल्या सार्थक रंजनच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. दिल्लीकडून २३ वर्षाखालील संघात खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या हितेन दलाल या खेळाडूला डावलून सार्थक रंजनची संघात निवड करण्यात आलेली आहे. मात्र याआधीच्या हंगामात सार्थक रंजनने अवघ्या ३ सामन्यांमध्ये १० धावा केल्याने, त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

सार्थक राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते आणि माधेपुरा लोकसभा मतदार संघाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांचा मुलगा आहे. पप्पू यादव यांनी आता स्वतःचा जन अधिकार पार्टी नावाने स्वतंत्र पक्ष काढला आहे. याचसोबत त्यांची पत्नी रंजीत राजन काँग्रेसच्या तिकीटावर सौपल मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सार्थकच्या निवडीवरुन दिल्ली क्रिकेट असोसिएशनची निवड समितीच सध्या चांगलीच टिकेची धनी बनत आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंतची दिल्लीच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी, रणजी करंडकातली खराब कामगिरी भोवली

रणजी हंगामाच्या सुरुवातीला सार्थकची दिल्लीच्या संभाव्य संघात निवड झालेली होती. मात्र यामधून सार्थकने माघार घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मध्यंतरीच्या काळात सार्थक क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत होता, यासाठी त्याने शरीरसौष्टव स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र सार्थकची आई खासदार रंजीत राजन यांनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे व्यवस्थापक निवृत्त न्यायमुर्ती विक्रमजीत सेन यांना ई-मेल करुन आपला मुलगा मानसिक तणावाखालून जात होता असं स्पष्ट केलं. मात्र आता त्याची तब्येत सुधारली असून तो पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं रंजीत राजन यांनी सेन यांना लिहीलेल्या ई-मेल मध्ये म्हटलं आहे.

नियमांनुसार खासदार रंजीत राजन यांनी सार्थक याच्यासाठी लिहीलेलं पत्र विक्रमजीत सेन यांनी निवड समितीकडे पाठवलं. यानंतर सार्थकची २३ वर्षाखालील सी. के. नायडू करंडक स्पर्धेत दिल्लीसाठी राखीव संघात निवड करण्यात आली. मात्र सी. के. नायडू स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या हितेन दलालला राखीव खेळाडूंमध्ये ठेवून सार्थकची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघात निवड करण्यात आली. निवड समितीच्या या निर्णयामुळे दिल्ली क्रिकेट असोसिएशन खासदारपुत्राला संघात घेण्यासाठी एका गुणी खेळाडूवर अन्याय करत असल्याची ओरड होऊ लागली आहे.