विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने चांगली लढत दिली. पण अखेरच्या क्षणी आपल्या हातून सामना निसटला आणि जेतेपद पटकावता आले नाही, असे मत सिंधूने सामन्यानंतर व्यक्त केले आहे. अंतिम फेरीत सिंधूपुढे जपानच्या नोझोमी आकुहाराचे आव्हान होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने गमावला असला तरी दुसरा गेम जिंकत तिने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या गेममध्ये सिंधू आणि ओकुहारा यांची २०-२० अशी बरोबरी झाली होती, पण त्यानंतर सिंधूने दोन गुण गमावले आणि तिच्या हातून जेतेपद निसटले. ‘तिसऱ्या गेममध्ये २०-२० असे दोघांचेही समान गुण होते. त्या वेळी जेतेपद कोण पटकावेल हे सांगता येणे कठीण होते. निश्चितच आम्ही दोघीही सुवर्णपदक पटकावण्यासाठी आतूर होतो. जेतेपद पटकावण्याच्या मी फार जवळ होते. पण अखेरच्या क्षणी सारे चित्र पालटले आणि मला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीने मी निराश आहे,’ असे सिंधूने सांगितले. ती पुढे म्हणाली की, ‘आकुहारा ही बलाढय़ स्पर्धक होती. तिच्याविरुद्ध खेळणे नक्कीच सोपे नव्हते. या सामन्यात कुठेही मी गाफील राहिली नाही. प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात आम्ही दोघींनीही दमदार खेळ केला. पण तो दिवस माझा नव्हता.’ अंतिम सामन्याविषयी सिंधू म्हणाली की, ‘हा सामना रोमहर्षक होता. कारण प्रत्येक वेळी खेळात कुरघोडी सुरू होत्या. प्रत्येक गेम अटीतटीचा होता. आम्ही १४-१४, १८-१८, २०-२० असे प्रत्येक वेळी बरोबरीत होतो. कुठेही उसंत घेण्यासाठी वेळ नव्हता. आम्ही दोघींनीही पूर्णपणे व्यावसायिक खेळ केला. पण मी दुर्दैवी ठरले. पण भारतासाठी रौप्यपदक जिंकू शकले, या गोष्टीचा अभिमानही आहे. या स्पर्धेतून मी बरेच काही शिकले आहे. त्यामुळे यापुढील स्पर्धासाठी हे पदक नक्कीच प्रेरणादायी ठरेल.’