पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेसचे आणि भारत-बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत समान महत्त्व कसे असू शकते. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह आहे, अशी टीका इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केली आहे. साऊदम्पटन येथील एजेस बाऊल मैदानावर १८ ते २२ जून या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रत्येक मालिकेला समान गुणांचे वाटप केले आहे. त्यामुळे जे संघ कमी सामने खेळतात, त्यांच्या गुणसंख्येवर फारसा परिणाम होत नाही. ‘‘जागतिक कसोटी अजिंक्यपद ही अत्यंत प्रशंसनीय संकल्पना आहे. हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत समस्या आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील मालिकेचे भारत-बांगलादेश मालिकेइतकेच महत्त्व असणे अयोग्य आहे,’’ असे ब्रॉडने सांगितले. ‘‘जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणपद्धतीनुसार, मालिकेचे निकाल नव्हे, तर सामन्यांचे निकाल ग्रा धरले जातात. म्हणजेच पाच सामन्यांच्या मालिकेसाठी प्रत्येक सामन्यासाठी २० टक्के गुण मिळतात, तर दोन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यासाठी ५० टक्के गुण मिळतात,’’ असे विश्लेषण ब्रॉडने केले. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत इंग्लंडचा संघ सर्वाधिक २१ सामने खेळला, तर त्यानंतर भारत १७ सामने खेळला. परंतु तळाच्या स्थानावरील बांगलादेशचा संघ्ज्ञ फक्त सात सामनेच खेळला. ‘‘आमचा संघ अधिक सामने खेळल्यामुळे सध्याच्या गुण पद्धतीनुसार अंतिम फेरी गाठणे कठीण झाले,’’ असे ब्रॉडने सांगितले. भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अंतिम फेरी गाठली. पण इंग्लंडला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.