महिला विश्वचषकात भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याला संपूर्ण जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचं समोर येतं आहे. आयसीसीने नुकतच प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन हा सामना पाहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीची घोषणा केली आहे.

जगभरात तब्बल १८ कोटी लोकांनी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिल्याचं आयसीसीने म्हणलं आहे. या सामन्यात मिताली राजच्या भारतीय संघावर इंग्लंडच्या संघाने ९ धावांनी मात केली होती. भारतामध्येही या सामन्याला क्रीडारसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. भारतात तब्बल १५ कोटी ६० लाख लोकांनी हा सामना लाईव्ह पाहिला. यात सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे १५ कोटी पैकी ८० लाख लोकं ही भारताच्या विविध ग्रामीण भागातली आहेत.

आयसीसीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानूसार २०१३ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्याची तुलना केली असता यंदाच्या अंतिम सामना लाईव्ह पाहणाऱ्यांच्या संख्येत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या महिला विश्वचषकाला दक्षिण आफ्रिकेत सर्वाधीक प्रतिसाद मिळाला असून, भारताच्या ग्रामिण भागातही लोकांनी महिला विश्वचषकाला चांगला प्रतिसाद दिला.

याव्यतिरीक्त आयसीसीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओंना १० कोटी लोकांनी आपली पसंती दर्शवली. तर आयसीसीच्या फेसबूक पेजवर यंदा ६७ कोटी लोक नव्याने जोडली गेली. त्यामुळे आगामी काळात महिला विश्वचषक आणि इतर स्पर्धांना असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आयसीसीचे मुख्य अधिकारी, डेव्हिड रिचर्डसन यांनी व्यक्त केली आहे.