भारताच्या मिश्र रिले चमूला रौप्यपदक

दोहा : भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले चमूने आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे, तर संजीवनी जाधवने १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

४ बाय ४०० मीटर मिश्र रिले हा प्रकार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात यंदा प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. भारताच्या मोहम्मद अनास, एम. आर. पूवम्मा, व्ही. के. विस्मया आणि अरोकिया रावजी या चमूने ३:१६.४७ मिनिटे वेळ राखून दुसरे स्थान मिळवले. या गटात बहरिनने सुवर्णपदक जिंकले. ४०० मीटर शर्यतीतून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेणारी हिमा दास या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकच्या २२ वर्षीय संजीवनीने ३२ मिनिटे आणि ४४.९६ सेकंद अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवताना भारताच्या खात्यावर कांस्यपदक जमा केले. बहरिनची शिताये हॅबटेगेब्रेल (३१:१५.६२ मि.) आणि जपानच्या हितो निया (३१:२२.६३ मि.) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर नाव कोरले.