पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार असून उपांत्य फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीमध्ये भारतातील आठ शहरांमध्ये विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. यामध्ये बंगळुरु, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. विश्वचषकाचा एक उपांत्य सामना मुंबई होणार असून उर्वरित उपांत्य फेरीचा सामना नवी दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्याचे समजते आहे.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा एक उपांत्य फेरीचा सामना मुंबईमध्ये आणि दुसरा दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण जर पाकिस्तानसारखा संघ असेल तर त्याच्यासाठी धरमशाला हा पर्याय ठेवण्यात आला आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
२०११ साली झालेल्या विश्वचषकामध्ये ईडन गार्डन्सवर सामन्यांना मुकावे लागले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेला (आयीसीसी) ईडन गार्डन्स विश्वचषकासाठी सज्ज वाटत नसल्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवण्यात आला होता. पण यापूर्वी ईडन गार्डन्सवर बरेच महत्त्वाचे सामने खेळवण्यात आले आहेत. १९८७ साली झालेल्या रिलायन्स चषकाची अंतिम फेरी आणि १९९६ साली झालेल्या विश्वचषकाची उपांत्य फेरी ईडन गार्डन्सवर झाली होती.
‘‘आयसीसी आणि बीसीसीआयच्या नियमांची पूर्तता केल्याची पाहूनच आम्ही ही शहरे विश्वचषकाच्या सामन्यांसाठी निवडली आहेत,’’ असे बीसीसीआयने पत्रकामध्ये म्हटले आहे.
‘‘विश्वचषकासारखी स्पर्धा भरवणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. निवडलेल्या शहारांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. हा विश्वचषक अविस्मरणीय राहावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या मोठय़ा स्पर्धेत कुठलीही कसूर आम्ही ठेवणार नाही,’’ असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने व्यवस्थापकीय समिती स्थापन केली होती. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया, अनुराग ठाकूर, अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी, जी. गंगा राजू, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशीष शेलार, आशीर्बाद बेहरा यांचा समावेश आहे.